Sunday, May 9, 2010

ने मजसी ने

‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता


त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू


त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले


पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी


तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।


लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी


पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती


तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा


राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे


हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?


माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे


माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.

मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !

स्वामी माधवानंद

सौजन्य -http://www.savarkar.org/

Wednesday, January 13, 2010

सिंधू नदी मुक्‍त करण्याचे ध्येय!

बरोबर १०० वर्षांपूर्वी पंचविशीतील सावरकर स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या ऐतिहासिक कार्यात लंडनमध्येच गढून गेले होते. ब्रिटिशांनी काढून घेतलेले शस्त्र मिळवून ते त्यांनी भारतीय तरुणांच्या हातात दिले, जे तरुण स्वतंत्र भारताची उत्तम प्रकारे सेवा करू शकतील त्यांना हुडकून भारतनिष्ठ आणि सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले आणि संधी मिळताच ब्रिटनविरुद्ध युद्ध छेडण्याच्या दृष्टीने सशस्त्र क्रांतीकारकांचे आंतरराष्ट्रीय संधान त्यांनी बांधले. हे त्यांनी कसे साधले याचा अभ्यास केला, तर आजच्या युवकांना निराशा शिवणारदेखील नाही. संक्षेपाने सांगायचे तर सावरकरांनी मराठी तरुणांना नित्य म्हणावयाच्या आपल्या स्नानमंत्रातील पाकिस्तानात ढकलण्यात आलेली सिंधू नदी मुक्‍त करण्याचे ध्येय दिले आहे. ते ध्येय व्यवहारात उतरवणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी सैन्यात शिरण्याचा कार्यक्रम दिला आहे. आपल्या सेनादलात अधिकार्‍यांची १२,००० पदे रिक्‍त आहेत. तरुणांना आपण सैनिक व्हावे, असे वाटत नाही; म्हणून ही पदे भरली गेली नाहीत. `महाराष्ट्र भारताचा खड्गहस्त' असे सावरकर म्हणाले होते. त्याला जागून मराठी तरुण सैन्यात शिरले, तर महाराष्ट्राचेच काय अवघ्या भारताचे नवनिर्माण ते करू शकतील !

Monday, January 11, 2010

हुतात्म्यांनो !!!!!!!

१९०७ साली लंडन येथे १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाला ५० वर्षे झालेली होती. या सुवर्णमहोत्सवी दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या हुतात्म्यांना उद्देशुन वक्तव्य केल होतं. सावरकरांनी केलेल वक्तव्य मुंबईच्या सावरकर सदन येथे आजही लिहिलेल आढळते.

"भारताच्या रणांगणावर तुम्ही स्वातंत्र्य संग्रामातील पहिली मोहिम सुरु केलीत ती १८५७ या नित्यस्मरणीय वर्षी! जो सतत फडकत राहवा असा ध्वज तुम्ही या दिवशी उभारलात; ज्यांच्या पुर्तीत धन्यता वाटावी अशा ध्येयाचा उच्चार तुम्ही या दिवशी केलात, जे स्वप्न सत्यसृष्टीत उतरण्यात धन्यता वाटावी असे स्वप्नही तुम्ही या दिवशी पाहिलेत, राष्ट्र म्हणुन आपण अवतीर्ण होत आहोत हे सत्य तुम्ही या दिवशी उदघोषित केलेत. तुम्ही केलेल्या घोषणांचा स्वीकार करतो. क्रांतीयुद्धाच्या धुमश्चक्रीत तुम्ही 'मारो फिरंगी को' हे प्रेषिताला शोभेल असे शब्द उच्चारुन जे दाहक कार्य निश्चित केलेत ते पुढे चालवण्याचा निर्धार आहे. फांसावर जाताना आपण एखाद्या भविष्यवाद्याला शोभेल असे शब्द उच्चारलेत -: 'तुम्ही आज मला फासावर लटकवु शकाल, पण कदाचित माझ्यासारख्यांना तुम्ही प्रत्यही देखील फासावर चढवु शकाल पण माझी जागा भरुन काढण्यासाठी सहस्त्रावधी लोक पुढे सरसावती, तुमचा हेतु कधीच सफल होणार नाही.' हुतात्म्यांनो! तुमच्या रक्ताचा बदला घेतला जाईल."

Tuesday, January 5, 2010

देशभक्‍त डॉ. नारायण दामोदर सावरकर !


त्रिवर्ग सावरकर क्रांतीकारक बंधूंमध्ये डॉ. नारायणराव सावरकर हे धाकटे. बुद्धीमत्ता, प्रतिभा, उत्कट देशभक्‍ती आणि कर्तृत्व यांमध्ये मात्र ते वडील बंधूंहून थोडेही उणे नव्हते. एकाच ध्येयाने प्रेरित असे हे तिघे बंधू सशस्त्र क्रांतीच्या एकाच मार्गाने `अभिनव भारत' संघटनेत आणि पुढे `हिंदुमहासभा' या एकाच राजकीय पक्षात कार्य करीत राहिले.

विद्यार्थीदशेपासूनच क्रांतीचे विचार !

देशभक्‍त नारायणरावांचा जन्म २५ मे १८८८ रोजी झाला. सावरकरांचे घराणे मुळात श्रीमान; परंतु एकावर एक आकस्मिकपणे कोसळत गेलेली संकट परंपरा आणि आपत्ती यांच्यामुळे नारायणरावांचे बालपण कष्टमय परिस्थितीत गेले. आई-वडिलांचे छत्र दैवाने लवकर हिरावून घेतल्यामुळे त्यांचे लालनपालन मोठे बंधू गणेशपंत तथा बाबाराव आणि त्यांची पत्‍नी सौ. येसूवहिनी यांनी केले. विख्यात लेखक आणि चरित्रकार द.न. गोखले `क्रांतीवीर बाबाराव सावरकर' या चरित्रग्रंथात म्हणतात, `नारायणराव अर्भक असतांना मातेच्या ममतेने आणि पित्याच्या प्रेमळपणाने बाबांनी त्यांचे संगोपन केले. आपल्या तात्याप्रमाणे आपला बाळही देशभक्‍त व्हावा, म्हणून ते नारायणरावांचे शिक्षण मोठ्या आशेने करत. त्यांची ती आशा नारायणरावांनी इंग्रजी तिसरीत गेल्यापासूनच पुरी करण्यास प्रारंभ केला. बाबा-तात्यांपासून त्यांनी जी स्फूर्ती घेतली तिच्या बळावर त्यांनी `मित्रसमाज' या विद्यार्थी संघटनेचा व्याप उभा केला आणि तो समर्थपणे सांभाळून क्रांतीकक्षेत कितीतरी तरुण आणून सोडले. आपल्या स्फूर्तीप्रद वक्‍तृत्वावर ते विद्यार्थीदशेपासून तरुणांना मोहवत आणि थोरांकडून वाहवा मिळवत. मॅट्रिकनंतर १९०८ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी बडोद्याला गेले आणि तेथे त्यांनी `अभिनव भारता'ची शाखा स्थापली. या शाखेत अजमासे दोनशे तरुण प्रतिज्ञित झाले होते. बडोद्याचे संघटनकार्य `मित्रसमाजा'प्रमाणेच नारायणरावांनी नावारूपाला आणले. त्याच वेळी अभ्यास सांभाळून माणिकरावांच्या व्यायामशाळेत कुस्ती, मल्लखांब, लाठी इत्यादींचे त्यांनी उत्तम शिक्षण घेतले. नारायणराव सुटीत नाशिकमध्ये आले की, तेथल्या मुलांशी या विद्येची देव-घेव चाले. नाशिकमधल्या उद्योगात सैनिक संचलन, नेमबाजी नि भिंतीवर चढण्याची कला यांचाही समावेश होता. हा `मित्रसमाज' म्हणजेच अन्यत्र उल्लेखलेला `मित्रमेळा'. मित्रमेळयाच्या साप्‍ताहिक सभा होत नि त्यात देशाविषयी वेगवेगळया पुस्तकांद्वारे चर्चा चाले. स्फूर्तीप्रद विचार मांडले जात.

सहा महिन्यांची शिक्षा !

१८९९ ते १९०८-९ पर्यंत नाशिकमध्ये क्रांतीकार्य जोरात चालू होते. या क्रांतीकार्याच्या परिणामी वयाच्या केवळ अठराव्या वर्षीच इतिहासप्रसिद्ध `नाशिक कट' अभियोगात नारायणरावांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. (बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली २१ नोव्हेंबर १९०९ या दिवशी. त्याआधीच कर्णावतीला झालेल्या ध्वमस्फोटांच्या संबंधात नारायणरावही पकडले गेले. लंडनमध्ये असलेल्या विनायकरावांवर ब्रिटीश शासनाची वक्रदृष्टी होतीच.) आरक्षींनी (पोलिसांनी) केलेली मारहाण सहन करून, शेवटी पुराव्याअभावी ते त्यातून निर्दोष बाहेर पडले. १८ डिसेंबर १९०९ ला ते घरी येऊन टेकतात, तोच २१ डिसेंबरला नाशिकलाच अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला. त्याच रात्री नारायणराव पकडले गेले नि पुन्हा छळयातनांच्या चक्रात सापडले.
२१ जून १९११ ला सुटल्यानंतर त्यांना कोठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेना. शेवटी कोलकात्याच्या `नॅशनल मेडिकल महाविद्यालयात' प्रवेश मिळाला. आर्थिक चणचण, शासकीय गुप्‍त आरक्षींचा ससेमिरा, पुन:पुन्हा होणार्‍या चौकशा यांना तोंड देत, १९१६ मध्ये नारायणराव `अँलोपथी' आणि `होमिओपथी' या दोन्हींचे पदवीधर झाले. `दंतचिकित्सा' या विषयातही त्यांनी पदवी घेतली. त्या दिवसांत शिक्षणव्यय भागवण्यासाठी त्यांनी अधूनमधून व्यापारी पेढ्यांवर कारकुनाचे कामही केले. विद्यार्थीदशेत त्यांना मॅडम कामा यांनी फ्रान्समधून पाठवलेल्या अर्थसाहाय्याचे मोलच करता येणार नाही !
कोलकात्यामधील त्या दिवसांतच नारायणराव आणि डॉ. हेडगेवार यांची मैत्री झाली. त्या दिवसांतली एक गोष्ट सांगण्याजोगी आहे.
तिघाचौघा मित्रांचा एक गट झाला होता. आर्थिक अडचण तर नेहमीचीच. खानावळीतून दोन व्यक्‍तींचा डबा मागवायचा आणि तो चौघांनी वाटून खायचा, असे चाले. अर्थातच तो अपुरा पडे. `तुम्ही पाठवता तो डबा पुरत नाही' असे खानावळवाल्याजवळ एकदा गार्‍हाणे केल्यावर थोडी वादावादी झाली; पण तो म्हणाला, " तुमच्यापैकी एकाने एक दिवस इथे येऊन जेवावे. तो जेवढे खाईल तेवढे मी पाठवीन."
वसतीगृहावर आल्यावर विचारविनिमय झाला आणि डॉ. हेडगेवारांनी जेवण्यास जावे असे ठरले. हेडगेवार जेवायला गेले आणि त्यांनी बावीस-चोवीस पोळया खाल्ल्या ! खाणावळवाला पहात होता. त्याची दानत अशी की, त्याने शब्द पाळला. तो प्रतिदिन तेवढ्या पोळया पाठवू लागला आणि चौघांचे बर्‍यापैकी भागू लागले !
या प्रसंगाविषयी विख्यात लेखक पु.भा. भावे एका लेखात म्हणतात, " खादाडपणाची ही कहाणी हिंदुत्वाला अमृतवाणी ठरली. कारण त्या काळात खाल्लेला प्रत्येक घास हिंदुजातीचे आयुष्य वर्षावर्षाने तेज:पुंज व पराक्रमी करता झाला. पुढे १९४० सालापर्यंत ठिकठिकाणी घडणार्‍या मुसलमानी अत्याचारांना ठायीठायी हाणण्यात आले ते याच सावरकर-हेडगेवार मैत्रीमुळे !"

चार पदरी संसार !

वैद्यकीय पदवीग्रहणानंतर १९१६ मध्ये मुंबईतच वैद्यकीय व्यवसाय करण्याचे ठरवून डॉ. नारायणरावांनी औषधालय थाटले. या औषधालयाचे उद्घाटन करण्याची त्यांनी साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांना विनंती केली. त्यांनीही ती आनंदाने स्वीकारली, कारण त्यांनाही डॉ. नारायणरावांच्या देशभक्‍तीचे कौतुक होते. यापूर्वी म्हणजे १९१५ साली सौ. येसूवहिनींच्या आग्रहामुळे त्यांनी विवाह केला होता. त्यामुळे मुंबईत औषधालयाबरोबरच घर घेऊन त्यांनी संसारही थाटला.
एकीकडे व्यवसाय, दुसरीकडे प्रपंच, तिसरीकडे गुप्‍तपणे क्रांतीकार्य व क्रांतीकारकांना साहाय्य आणि प्रत्यक्षपणे करता येईल तितके समाजकार्य अशी चौपदरी जीवनक्रमाची त्यांची घोडदौड चालू झाली.

लोकमान्य टिळकांचे अनुयायित्व !

लो. टिळकांच्या मुंबईतील सार्‍या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी झटणार्‍या अनुयायांत डॉ. नारायणराव पुढे असत. लो. टिळकांच्या दौर्‍यात ते अनेकदा त्यांच्याबरोबर असत. काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांना ते नियमितपणे उपस्थित रहात. मुंबईतील सार्वजनिक कामांतील त्यांच्या नावलौकिकामुळे ते काही काळ मुंबई नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य होते. प्रारंभीच्या काळात अन्य अनेक नेत्यांप्रमाणेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ब्रिटीशविरोधी सत्याग्रहात आणि विधायक कार्यक्रमांत भाग घेतला व शिक्षा भोगल्या. १९२५ नंतर रा.स्व. संघाच्या प्रसारात मन:पूर्वक साहाय्य केले आणि त्यानंतर १९३७ पासून हिंदुमहासभेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले. या सर्व काळात अखेरपर्यंत हिंदुस्थानच्या हितार्थ स्वातंत्र्यप्राप्‍तीसाठी आणि हिंदुहितासाठी कार्य हे सूत्र मात्र कधीही सुटले नाही. क्रांतीकार्याला त्यांचे गुप्‍तपणे साहाय्य असेच. स्वत:चे शिक्षण पूर्ण करून व्यवसाय आणि प्रपंच करतांनाच, प्रभावी वक्‍तृत्व, लेखन आणि विधायक सामाजिक कार्य यांद्वारे दोघा वडील बंधूंच्या कार्यास पूरक कार्य ते करत राहिले.

लेखनकार्य आणि समाजकार्य !

अब्दुल रशीदने स्वामी श्रद्धानंदांचा खून केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ डॉ. ना.दा. सावरकरांनी `श्रद्धानंद' नावाचे साप्‍ताहिक चालू केले. `या साप्‍ताहिकातील लिखाणाचा व बुद्धीवादाचा माझ्यावर खोल ठसा उमटला', असे पु.भा. भावे यांनी म्हटले आहे. १० जानेवारी १९२७ ते १० मे १९३० पर्यंत ते `श्रद्धानंद'चे संपादक- संचालक होते.
लोकमान्यांच्या निधनानंतर गिरगांव चौपाटीवरील त्यांच्या दहनस्थानी कुठल्याही प्रकारे स्मारक उभारण्यास ब्रिटीश शासन अनुमती देत नव्हते. परंतु अनेक `टिळक भक्‍तांनी' त्या जागेचे पावित्र्य जपले. त्या जागेचा सांभाळ केला. पुढे १९३० मध्ये स्मारक उभे राहिले. त्या सर्व कामांत डॉ. नारायणरावांचा सहभाग होता. चौपाटीवर हिंदु धर्माची निंदा करून ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्‍या एका मिशनर्‍याला डॉ. नारायणराव, डॉ. वेलकर आणि सुरतकर या तिघांनी असा धडा शिकवला की, त्याने पुन्हा तिथे पाय ठेवला नाही !
मुंबईत जागोजाग असणार्‍या पठाणांच्या जागी रक्षक म्हणून गुरखे आणणे हे डॉ. नारायणरावांनी केलेले आणखी एक कार्य. श्रद्धानंद महिलाश्रमाच्या प्रमुख संस्थापकांपैकीही ते एक होते. या आश्रम उभारणीसाठी आणि नंतर त्याच्या प्रत्यक्ष कार्यातही त्यांनी मन:पूर्वक कष्ट घेतले. गोव्यातील गावडे लोकांच्या शुद्धीकरणाची जी प्रचंड चळवळ विनायक महाराज मसूरकर यांनी सुरू केली, त्या कार्याला डॉ. नारायणरावांचे सर्व प्रकारे साहाय्य होते. १९२५, १९३७, १९३९ या वर्षी मुंबईत झालेल्या हिंदु-मुस्लिम दंग्यांत प्रत्याघात करणार्‍या हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी त्यांनी वाहिली !

विशेष साहित्यसेवा !

३० एप्रिल १९३० ला नारायणरावांना झालेल्या कारावासामुळे `श्रद्धानंद' साप्‍ताहिक बंद पडले. राजकीय कार्याच्या धकाधकीतही त्यांनी साहित्यसेवा केली. `वसंत' या टोपणनावाने लिहिलेले काव्य, १८५७ च्या समराच्या पार्श्‍वभूमीवर लिहिलेली `मरण कि लग्न' ही कादंबरी, `जातिहृदय' या नावाखाली लिहिलेली `समाजरहस्य' ही कादंबरी, `जाईचा मंडप' कादंबरी; सेनापती टोपे यांचे चरित्र, `हिंदूंचा विश्‍वविजयी इतिहास' इत्यादी त्यांचे साहित्य गाजले. स्वा. सावरकरांच्या `हिंदुत्व' आणि `हिंदुपदपादशाही' या महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवादही त्यांनी केले.
३० जानेवारी १९४८ ला गांधीवध झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांच्या रहात्या घरावर गुंडांनी दगडफेक आणि हल्ला करून आजारी असलेल्या डॉ. नारायणरावांना भयंकर जखमी केले. ते बेशुद्ध झाले. तितक्यात आरक्षी पोहोचल्याने त्यांचे प्राण वाचले; परंतु त्यांना के.ई.एम्. रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांना अटक करण्याची शासकीय आज्ञा असल्याने तेथे त्यांच्यावर पोलीस पहारा होता. यातून डॉ. नारायणराव वाचले खरे, पण यामुळे खालावलेली त्यांची प्रकृती पूर्वपदावर आलीच नाही. ऑक्टोबर १९४९ च्या पहिल्या आठवड्यात पुणे येथील `दै. प्रभात'साठी `हिंदूंचा विश्‍वविजयी इतिहास' या लोकप्रिय झालेल्या लेखमालेतील लेख लिहित असतांनाच डॉ. नारायणरावांना अर्धांगवायूचा झटका आला व ते बेशुद्ध पडले. १९ ऑक्टोबर १९४९ ला त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले.
आपल्या दोन्ही बंधूंप्रमाणेच देशसेवेत अग्रेसर राहून डॉ. नारायणराव सावरकर यांनीही `सावरकर' कुलाचे नाव उज्ज्वल केले !

Monday, January 4, 2010

क्रांतीवीर बाबाराव सावरकर !



स्वा. सावरकरांना घडवणारे शिल्पकार

क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.

बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ रोजी झाला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. पुढील क्रांतीकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्‍ती यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीतदेखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी `मित्रमेळा' या संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजर्‍या करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्‍ती जागृत होण्यास खूपच मदत झाली. या निमित्ताने लोकमान्य टिळक, `काळ' या वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्‍तीने रसरसलेली भाषणे नाशिककरांना ऐकण्याची संधी प्राप्‍त झाली.

वन्दे मातरम् अभियोग !

बाबारावांचा (`साहेब' हा शब्द फारसी. त्यामुळे साहेब ऐवजी `राव' हा शब्द सावरकरबंधूंनी रूढ केला. जसे बाबाराव, तात्याराव) ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली, या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड करण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्‍यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्‍या तरुणांनी `वन्दे मातरम्'चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने `बोंब मारणे बंद करा', असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र त्या पोलिसावरच पश्चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले ! या प्रसंगाने संतप्‍त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग' या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळया ठिकाणी सहा महिने चालला; कारण न्यायाधीश फिरतीवर असत आणि ते असतील तेथे हा अभियोग चालत असे. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा प्रतिभू (जामीन) मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या. बाबाराव नाशिकमध्ये असतांना त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाच्या अनेक चळवळी सुरू केल्या. स्वदेशी चळवळ, विलायती मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात इत्यादी चळवळींचे सूत्रसंचालन बाबाराव धुरिणत्वाने करत असत.

प्रकाशक बाबाराव !

याच सुमारास बाबारावांचे पाठचे बंधू स्वा. वि.दा. सावरकर लंडनमध्ये शिक्षण घेत होते. १९०६ साली स्वा. सावरकरांनी लिहिलेले प्रसिद्ध इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचे हस्तलिखित बाबारावांकडे आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे चरित्र अत्यंत स्फोटक होते. जून १९०७ मध्ये बाबारावांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. दोन महिन्यांतच २ सहदा प्रतींची पहिली आवृत्ती जवळ जवळ संपली. पुस्तकाच्या विषयाबरोबर बाबांचे परिश्रमही याला कारणीभूत होते. या पुस्तकाला स्वा. सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्या वेळी अनेकांनी मुखोद्‌गत केली. यातील ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला. लवकरच स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या आणि हॉलंडमध्ये मुद्रित केलेल्या `१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाच्या प्रती बाबारावांच्या हाती आल्या. बाबारावांनी या प्रतीही अत्यंत गुप्‍तपणे क्रांतीकारकांपर्यंत पोहोचवल्या. या अद्वितीय ग्रंथामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्रात `गदर' पक्षाची स्थापना होऊ शकली ! `अभिनव भारत' संघटनेतील युवकांना आपण कोणत्या आगीशी खेळत आहोत, तसेच आपल्या कृत्यांना भारतीय दंडविधानात (इंडियन पिनल कोड) कोणत्या शिक्षा सांगितल्या आहेत, हे कळावे म्हणून भारतीय दंडविधानाची एक छोटी आवृत्तीही बाबारावांनी छापून घेतली होती. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर समजून उमजून तरुणांनी क्रांतीकार्याला हात घालावा, हा उद्देश यामागे होता ! लंडनहून स्वा. सावरकरांनी हातबाँब तयार करण्याचे तंत्र शिकवणारे कागदपत्र सेनापती बापट यांच्यामार्फत बाबारावांकडे पाठवले. बाबारावांनी हातबाँब तयार करण्याची ही कृती क्रांतीकारकांपर्यंत पोचवली. या कृतीवरूनच खुदिराम बोस यांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हिंदुस्थानात सिद्ध झालेला पहिला बाँब टाकला !

१ महिना सश्रम कारावास !

या सर्व व्यापांमुळे बाबारावांना अटक करण्याची संधी ब्रिटीश शासन शोधू लागले. ११ जून १९०८ रोजी शिवरामपंत परांजपे यांना पुण्यात अटक करण्यात आली आणि दुसर्‍याच दिवशी मुंबईला आणून त्यांच्यावर अभियोग सुरू करण्यात आला. स्वराज्य चळवळीसंबंधी परांजपे यांच्या ओघवत्या आणि परिणामकारक वक्‍तृत्वाने अनेक तरुण भारले होते. त्यामुळे परांजपे यांच्या अटकेने बाबारावांसहित अनेक तरुण प्रक्षुब्ध झाले. त्यांना काही मदत करावी या हेतूने बाबारावही मुंबईत आले. तेथील न्यायालयासमोर एका खोजा जमातीच्या व्यापार्‍याला पोलीस अधिकारी खूप त्रास देत असलेला बाबारावांनी पाहिला. बाबारावांचे तरुण रक्‍त उसळून आले. त्या व्यापार्‍यास पाठीशी घालून बाबारावांनी त्या पोलीस अधिकार्‍याशी वितंडवाद घालावयास सुरुवात केली. त्यामुळे चिडून पोलिसांनी बाबारावांनाच अटक केली. हे काय प्रकरण चालले आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गायडर बाबारावांकडे आला आणि त्याने त्यांचे नाव विचारले. `बाबा सावरकर' हे नाव ऐकताच गायडरला अत्यानंद झाला. त्याने ताबडतोब बाबारावांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ रशियन क्रांतीसंबंधीचे एक पत्रक सापडले. त्या पत्रकाच्या आधारे बाबारावांना एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ती त्यांनी ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांत आनंदाने भोगली.

जन्मठेपेची शिक्षा !

क्रांतीकारकांच्या अनेक गुप्‍त उद्योगांत बाबाराव सावरकरांचा हात आहे आणि त्यांना त्यांचे मार्गदर्शनही लाभले आहे, हे ब्रिटीश गुप्‍तहेर खात्याने ओळखले होते. १९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद रचित चार क्रांतीकारी कविता प्रसिद्ध केल्या. त्यांपैकी `रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?' या कवितेत प्रतिपादले होते की, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जगातील कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. मग त्याला हिंदुस्थानच कसा अपवाद असेल ? या कविता प्रसिद्ध केल्या म्हणून सरकारने बाबारावांना अटक करून जन्मठेपेची अतिशय कठोर शिक्षा दिली. ८ जून १९०९ रोजी बाबारावांना शिक्षा होऊन अंदमानात नेण्यात आले. त्या वेळी ते जेमतेम ३० वर्षांचे होते !

अंदमान

अंदमानातील `सेल्युलर जेल'मध्ये असतांना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही. धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकार्‍याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली. संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे त्यांच्या रोमरोमांत भिनले असल्यामुळे त्यांनी अंदमानातच कारावास भोगत असलेल्या स्वा. सावरकरांच्या साहाय्याने तेथील राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगली वागणूक आणि अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार, संप आदी मार्गांनी लढा दिला. परिणामी त्यांना अधिकाधिक कठोर शारीरिक शिक्षा भोगाव्या लागल्या; परंतु त्याची तमा न बाळगता बाबारावांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले. अंदमानातील ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांची प्रकृती पार ढासळली आणि त्यांना क्षयाचा विकार जडला. ते अंदमानात असतांनाच त्यांची पत्‍नी सौ. येसूवहिनींनी या जगाचा निरोप घेतला. त्या दोघांची शेवटची भेटही मुजोर शासनाने होऊ दिली नाही. १९२१ मध्ये बाबारावांना हिंदुस्थानात परत आणण्यात आले आणि साबरमतीच्या कारागृहात ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत, असे शासनाच्या डॉक्टरने सांगितले तेव्हाच म्हणजे सप्टेंबर १९२२ मध्ये सरकारने त्यांची सुटका केली !

बाबारावांची ग्रंथसंपदा

बाबारावांनी अनेक पुस्तके लिहिली. `वीर बैरागी' या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले. या पुस्तकात बंदा वीराचे चरित्र सांगून हिंदूंना स्फूर्ती द्यावी, सूड कसा उगवावा ते शिकवावे तसेच पंजाबातील शीख आणि मराठे यांचा दुवा जोडावा, हा बाबारावांचा उद्देश होता. या पुस्तकात औरंगजेबाच्या मुसलमानी सत्तेशी वीर बंदा बैराग्याने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. `राष्ट्रमीमांसा' या पुस्तकात त्यांनी `भारत हे हिंदुराष्ट्र आहे' हे सिद्ध केले आहे. `श्री शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप' या पुस्तकात आग्र्‍याला जाण्यात शिवरायांचा हेतू औरंगजेबाचा वध करण्याचा होता, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. `वीरा-रत्‍नमंजुषा' या पुस्तकात महाराणी पुष्पवती, राजा दाहिरच्या दोन वीरकन्या, राणी पद्मिनी, पन्नादायी आदी रजपूत स्त्रियांची चरित्रे वर्णिलेली आहेत. `हिंदुराष्ट्र - पूर्वी, आता नि पुढे', `धर्म हवा कशाला ?', `ख्रिस्तास परिचय अर्थात् ख्रिस्ताचे हिंदुत्व' ही त्यांची अन्य पुस्तके आहेत.

बाबाराव आणि रा. स्व. संघ

संघाचा भगवा ध्वज डॉ. हेडगेवार यांनी बाबारावांकडून करवून घेतला. संघाची प्रतिज्ञाही बाबांनीच सिद्ध केली. त्यात थोडेफार शाब्दिक फेरफार करून डॉ. हेडगेवार यांनी ती स्वीकृत केली. बाबारावांनी स्थापन करून वाढवलेली `तरुण हिंदु महासभा' ही संघटना १९३१ मध्ये त्यांनीच संघात विलीन केली. संघाच्या सेनेत शिलेदारांची, म्होरक्यांची भरती करत असतांना बाबांनी संघाला अखिल भारतीय पाठिंबा मिळावा म्हणून अविश्रांत परिश्रम केले.

अखेरपर्यंत हिंदुराष्ट्राची चिंता

बाबारावांनी अखेरपर्यंत हिंदुराष्ट्राचीच चिंता वाहिली. बाबारावांच्या शेवटच्या दिवसांत चित्रमहर्षी भालजी पेंढारकर त्यांना भेटायला गेले असता त्यांनी भालजींना विचारले, ``माझ्या या हिंदुराष्ट्राचे कधीतरी पुनरुत्थान होईल काय ?'' भालजींनी उत्तर दिले, ``बाबा, हा महाराष्ट्र व हिंदु धर्म पुरातन, सनातन आहे. यानंतर खूप धर्म, राष्ट्रे जन्माला आली नि गेली. त्यामुळे या हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान नक्की होईल, यात मला शंका नाही !''

आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारा हा वीरात्मा १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे कालवश झाला. बाबारावांचे चरित्र म्हणजे राष्ट्रासाठी चंदनाप्रमाणे अखंड झिजलेल्या एका थोर देशभक्‍ताची स्फूर्तीदायी कथा आहे !

Monday, December 21, 2009

नेहरू घराणे आणि बाबरी मशीद

बाबरी मशीद पडली तेव्हा खरे म्हणजे सर्व हिंदूंना झाला. असे हिंदुत्वाचे विरोधक माधव गडकरी यांनीही लिहून ठेवले आहे. हिंदूंचा नेहरू घराण्यावर विश्‍वास राहिला आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटित नाहीत आणि हिंदुत्व ते ठामपणे मांडत नाहीत म्हणून लोक काँग्रेसला मत देतात एव्हढेच. हिंदूंनी जर मुसलमानांशी त्यांना समजेल अशा भाषेत सुसंवाद केला, तर नेहरू घराणे सर्वसामान्य मुसलमानांचीही कशी फसवणूक करते आहे, हे त्यांना पटवून देता येईल. तेव्हा बाबरी मशीद पडली तेव्हा नेहरू घराणे भारतावर राज्य करीत नव्हते. याकरिता हिंदूंनी नियतीचे आभार मानले पाहिजेत.

लेखक : श्री. अरविंद
विठ्ठल कुळकर्णी,
ज्येष्ठ पत्रकार,
मुंबई.

राहुल गांधींची मुसलमानधार्जिणी विधाने

आपण जवाहरलाल नेहरूंचे पणतू आहोत म्हणून आपणास भारताचे पंतप्रधान होण्याचा वंशपरंपरागत हक्क आहे, असे जे मानतात त्या राजीवपुत्र राहुल गांधी यांनी अलीकडे केलेली दोन विधाने हिंदूंनी संदर्भासहित स्पष्टपणे समजून घेतली पाहिजेत. `जर नेहरू घराण्यातील व्यक्‍ती पंतप्रधानपद धारण करून असती, तर बाबरी मशीद पडली नसती', असे एक उन्मत्त विधान राहुल गांधी यांनी लिबरहान आयोगाच्या बाबरी मशीद प्रकरणावरील प्रतिवृत्ताच्या संदर्भात हिंदूंच्या तोंडावर फेकले आहे. `भारताचा पंतप्रधान मुसलमान असू शकतो', असे दुसरे विधान त्यांनी एका मुसलमान संमेलनात केले आहे. वास्तविक पहिले विधान केल्यानंतर दुसरे विधान करण्याची काही आवश्यकता नव्हती. तथापि या दोन विधानात काँग्रेसच्या तत्त्वज्ञानाचा गाभा पुष्कळसा समाविष्ट होत असल्याने हिंदूंनी तो वरखाली करून नीट पारखून घेतला पाहिजे.


मोतीलालजींचे पुत्रप्रेम

जरी स्वातंत्र्य आंदोलनात मोतीलाल नेहरू (१८६१-१९३१) आघाडीवर होते, तरी नेहरू घराणे ओळखले जाते ते त्यांचे पुत्र जवाहरलाल यांच्या नावाने. बी.आर्. नंदा यांचे `दि नेहरूज' नावाचे छानसे पुस्तक आहे. त्यात मोतीलाल आणि जवाहरलाल यांची बरीच माहिती आहे. पुस्तकाचा शेवट मोहनदास करमचंद गांधी यांच्या उद्‌गारांनी केला आहे. `मोतीलालजींच्या व्यक्एतीमत्त्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य कोणते', असा प्रश्‍न गांधींना विचारला असता त्यांनी, ``त्यांच्या चिरंजिवावरचे त्यांचे प्रेम'' असे उत्तर दिले. `भारतावरचे प्रेम नाही का ?', असा प्रतिप्रश्‍न केला असता गांधी म्हणाले, ``मोतीलालजींचे भारतावरचे प्रेम त्यांच्या पुत्रप्रेमातून निर्माण झाले आहे.''


सावरकर परंपरा आणि नेहरू परंपरा

हे पुत्रप्रेम भारताला फारच महागात पडले आहे. तिन्ही सावरकर बंधूंनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनन्वित यातना सहन केल्या. `तीनच काय पण सात भाऊ असते, तरी देशासाठी अर्पण केले असते', असे एका कवितेत सावरकरांनी म्हटले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा नाशिकच्या न्यायालयातच `पहिला हप्‍ता' नावाच्या केलेल्या कवितेत आपली जन्मठेप म्हणजे मातृभूमीची केलेली अल्पस्वल्प सेवा आहे आणि ती गोड मानून घ्यावी, असे अत्यंत नम्रपणे त्यांनी म्हटले आहे. सावरकरी परंपरा असे मानते की, आपले राष्ट्र म्हणजे जननी स्वरूप आहे आणि तिच्या सुखासाठी सर्वोच्च पराक्रम आणि त्याग करणे हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य त्याने निरपेक्षपणे आणि आनंदाने केले पाहिजे. म्हणजे आपल्या सेवेची परतफेड म्हणून त्याने देशाकडे काही मागता कामा नये. त्याच्या उलट नेहरू परंपरेचे आहे. देशाची जी थोडीबहुत सेवा आपल्या हातून होईल त्याची पुरेपूर किंमत वसूल करण्यावर नेहरू परंपरा विश्‍वास ठेवते.


सावरकरांची भेटही न घेणारे नेहरू

त्यामुळे नेहरू घराण्याने देशासाठी नेमके काय केले आणि त्याप्रीत्यर्थ देशाकडून त्यांनी काय उपटले याचा ताळेबंद एकदा मांडला पाहिजे. स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्यामुळे मोतीलालना जेव्हा किरकोळ कारावास भोगावा लागत असे, तेव्हा बाहेर ज्या विलासात ते जीवन जगत त्या सर्व सुखसोयी आतमध्ये त्यांचेसाठी उपलब्ध करून दिल्या जात असत. कारण ब्रिटीश राज्यकर्त्यांशी त्यांचे संबंध मित्रत्वाचे होते. आपला एकुलता एक मुलगा जवाहरलाल संस्काराने पक्का इंग्रज व्हावा, अशी त्यांची इच्छा होती आणि कोवळया वयातच त्यांनी जवाहरला शिकायला लंडनला पाठविले होते. तेथे त्याचे जे स्थानिक ब्रिटिश पालक होते, ते जवाहरला भारतातील स्वातंत्र्य चळवळीचा वाराही लागणार नाही याची काळजी घेत. तेथे जवाहर भारतीय विद्यार्थ्यात कधी मिसळत नसे. त्याचवेळी सावरकरही शिष्यवृत्तीवर लंडनमध्ये शिकत होते. ते नुसते शिकत नव्हते, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत तेजस्वी पर्वाचे सूत्रसंचालन स्वत: करीत होते. पण सावरकरांची भेट घ्यावी, असे नेहरूंना कधी वाटले नाही. ब्रिटनच्या हेर खात्याचा प्रमुख कर्झन वायली यास बाबाराव सावरकरांच्या जन्मठेपेचा प्रतिशोध म्हणून मदनलाल धिंग्राने यमसदनास पाठविले. त्यानंतर देशभक्‍तीचे जे चैतन्यदायी वातावरण लंडनमधील भारतीय विद्यार्थ्यात संचारले त्याने बहुधा प्रभावित होऊन चर्चिल असे म्हणाला की, पुढचा दोन सहस्र वर्षे तरी मदनलालची स्मृती पुसली जाणे शक्य नाही; पण नेहरू प्रयत्‍नपूर्वक त्या मदनलाल पर्वापासून दूर राहिले. इतके की नंतर पुष्कळ वर्षांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात मदनलालचा उल्लेखही करावे नेहरूंना सुचले नाही.


नेहरूंची भारतमातेशी प्रतारणा


मुसलमानांनी पाकिस्तानकरिता दंगे चालू केले, तेव्हा ते मोडून काढणे नेहरूंना जमले नाही. सावरकरी संप्रदायापासून दूर रहाण्यात इतिकर्तव्यता मानल्याने मुसलमानांचे दंगे कसे मोडून काढायचे असतात ते कळण्यात ते कमी पडले. पाकिस्तानला मान्यता देण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ``आम्ही दमलो होतो, म्हणून विभाजन स्वीकारले'', असे नेहरूंचे उद्‌गार आहेत. खरे म्हणजे त्यांना सत्ता संपादनाची घाई झाली होती. पंतप्रधान होताच नेहरूंनी खंडित भारतातील `मुस्लीम लीग ही देशभक्‍तांची संघटना आहे', असे प्रशस्तिपत्र देऊन टाकले. त्यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास विरोध केला. निझामाला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावयाचे नव्हते. पाकिस्तानात सामील होण्याचा आटापिटा तो करीत होता. तरीदेखील त्याच्यावर काही कारवाई करू नये, असे नेहरू पटेलांना सांगत होते. पाकिस्तानने काश्मीर बळकावण्यासाठी भारतावर ससैन्य आक्रमण केले, तेव्हा नेहरूंनी सर्वप्रथम काश्मीरची सूत्रे हरिसिंग महाराजांकडून काढून घेतली आणि ती शेख अब्दुल्लाकडे सोपवली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याशी लढण्याकरिता त्यांनी भारताचे सैन्य पाठवले; पण त्याला सहज शक्य असूनही काश्मीर पूर्ण मुक्‍त करू दिला नाही. जवळजवळ निम्मा काश्मीर त्यांनी पाकिस्तानला भेट म्हणून दिला आणि निम्मा शेख अब्दुल्लाच्या पदरात टाकला. शेख अब्दुल्लाला मोकळे रान देण्यासाठी त्यांनी महाराजा हरिसिंग यांना काश्मिरातून हुसकावून लावलेच; पण एकंदरीत सर्व हिंदूंना काश्मिरात रहावयाचे असेल, तर ते मुसलमानांच्या सौजन्याशी जुळवून घेऊनच रहाता येईल, असे संकेत दिले. चीनने तिबेट गिळंकृत केला त्याचा यांना आनंद झाला. स्वत:च्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा यांना इतका गर्व होता की, `भारताला संरक्षणासाठी सैन्याची आवश्यकता नाही', असे प्रलाप त्यांच्या तोंडून बाहेर पडले. चीनने आक्रमण करून यांना धडा शिकविला आणि ३६ सहस्र चौ. कि.मी. प्रदेश घशाखाली घातला. तरी आपण सत्तात्याग करावा आणि प्रायश्चित्त घ्यावे, असे यांना वाटले नाही. सत्ता मिळताच यांनी पाकिस्तानचा पंतप्रधान लियाकत अली याला भारतात बोलावून घेतले आणि दोघांनी एकमेकांच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालायचे नाही, अशी संधी केली. त्याचा इतका दुष्परिणाम झाला की, पाकिस्तानात शासनाकडून हिंदूंचा होणारा छळ आपण बघत होतो; पण तो छळ थांबवावा म्हणून आपण काही करू शकत नव्हतो, असे पाकिस्तानातील भारताचे पहिले उच्चायुक्‍त श्रीप्रकाश यांनी लिहून ठेवले आहे. मदनलाल पर्वाचा नेहरूंनी इतका धसका घेतला होता की, लियाकत अलींना प्रसन्न करण्यासाठी ते आले, तेव्हा त्यांनी सावरकरांना काही काळ कारावासात डांबले होते. जी धोरणे ब्रिटिशांची तीच नेहरूंची होती. आपल्या राज्याचा सर्वात मोठा शत्रू सावरकर असेच दोघेही मानीत होते आणि दोघांनाही मुस्लीम लीग अत्यंत जवळची होती. आपल्यामागून इंदिरा गांधी पंतप्रधान व्हाव्यात म्हणून नेहरूंनी दबावतंत्राचा भरपूर वापर केला.



नेहरूंनी भारत हा हिंदुबहुल देश असल्याचे न सांगणे

बाबरी मशीद पडली तेव्हा मध्यपूर्वेतील एका सुलतानाने तेथील भारतीय राजदूताला बोलावून त्या आंदोलनाची पार्श्‍वभूमी समाजावून घेतली. भारत हा हिंदुबहुल देश आहे, हे ऐकून त्याला धक्का बसला. जगाला भारताची ओळख नेहरूंनी करून दिली आणि त्यांनी भारत हा हिंदुबहुल देश आहे, हे कधीही सांगितले नाही, असे उद्‌गार त्या सुलतानाने काढले.


बाबरी मशीद पडल्याचा हिंदूंना आनंद

तात्पर्य हे की नेहरूंनी मुसलमानांना पाकिस्तान दिले आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी मुसलमानांचे हितसंबंध जपण्यासाठी राज्ययंत्रणा वापरली. `हिंदू हे अपराधी आहेत आणि त्यांच्याकडून मुसलमानांवर अन्याय होतो' अशा समजाने ते पछाडलेले होते. राहुल गांधी म्हणतात ते खरे आहे की, नेहरू घराण्यातील व्यक्‍तीने बाबरी मशीद पाडू दिली नसती; पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, बाबरी मशीद पडली तेव्हा खरे म्हणजे सर्व हिंदूंना आनंद झाला. असे हिंदुत्वाचे विरोधक माधव गडकरी यांनीही लिहून ठेवले आहे. हिंदूंचा नेहरू घराण्यावर विश्‍वास राहिला आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटित नाहीत आणि हिंदुत्व ते ठामपणे मांडत नाहीत; म्हणून लोक काँग्रेसला मत देतात एव्हढेच. हिंदूंनी जर मुसलमानांशी त्यांना समजेल अशा भाषेत सुसंवाद केला, तर नेहरू घराणे सर्वसामान्य मुसलमानांचीही कशी फसवणूक करते आहे, हे त्यांना पटवून देता येईल. बाबरी मशीद पडली तेव्हा नेहरू घराणे भारतावर राज्य करीत नव्हते, याकारिता हिंदूंनी नियतीचे आभार मानले पाहिजेत. त्यानिमित्ताने तरी नेहरूंचा नियतीशी संबंध जोडता येईल.

सौजन्य -: सनातन प्रभात

मी नथुराम गोडसे बोलतोय.........



मी नथुराम गोडसे बोलतोय. हे नाटक मी एके दिवशी पाहिलं आणि मला शिकवला गेलेला इतिहास आणि स्वतःहुन माहिती करुन घेतलेला यामध्ये प्रचंड तफावत आढळली. आपल्याला शिकवलेला इतिहास हा नेहमीच कॉंग्रेस प्रणित असतो हेच माझ्या लक्षात आले. गांधी हत्येबद्दल कॉग्रेस प्रणित इतिहास एका नथुराम गोडसे नावाच्या हिंदु माथेफिरुने केलेली हत्या असेच वर्णन ऐकले होते. पण गोळी झाडाणारा नथुराम कोण होता? गांधी हत्येमागे नेमके कारण कोणते होते? गांधींच्या अहिंसावादी तत्वाला काही आधार होता की नाही? अखंड भारताच्या फाळणीला जीनांबरोबर गांधीही तितकेच जबाबदार होते का? गांधींच्या म्हणण्यानुसार मंत्रिमंडळाने पाकिस्तानला ५५ कोटी रूपये मदत म्हणुन का दिली. ( त्या रुपयांचावापर पाकिस्तानने काश्मीरमध्ये लढणार्या आपल्याच देशातील सैनिकांविरूद्ध वापरला. ) या सर्व आणि अशी अनेक प्रश्न निरुत्तरीत राहिली. मी आपल्यासमोर "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाचा सारांश नथुराम गोडसे यांच्याच शब्दात मांडण्याचा एक क्षीण प्रयत्न करीत आहे.

नथुराम गोडसे उवाच्

सगळे चेहरे अनोळखी. खरं म्हणजे अनोळखी हा शब्दच चुकीचा आहे, अनोळखी हा शब्द अभावाने का होईना पण ओळखीचा उच्चार, तुम्हा सगळ्यांचेच चेहरे मला नवीन पण नवीन आहेत म्हणजे परके नव्हेत तुमच्यापैकी तरुण असतील तेव्हा त्यांचा जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासात केवळ एक हिंदु माथेफिरु म्हणुन तुम्ही माझी नोंद पाहिली असेल. तुमच्या मध्ये मध्यमवयीन असतील त्यापैकी काही त्यावेळी चाललेल्या ब्राह्मणाच्या कत्तलीपासुन ते जीव वाचवु पहाणार्‍या आपल्या आई - वडिलांना कोण हा नथुराम त्याच्यामुळे आमची घर का जळता आहेत अशा विचार करत असतील. हं ! पण अगदी म्हातारे म्हणजे जुनीखोडं असतील त्यांना मात्र मी आठवत असेन; वृत्तपत्रातुन वाचलेला, आकाशवाणीवरुन ऐकलेला मी ! त्यापैकी काहींनी माझं आणि नाना आपटेंच अग्रणी हे वृत्तपत्र वाचलं असेल. सभांमधील माझी भाषण ऐकली असतील, कदाचित प्रत्यक्षात येऊन भेटलेही असतील. पण ती भेट आणि ही ओळख ३० जानेवारी १९४८ नंतर मात्र त्यांनी सतत नाकाराली असेल. हो पण इतक्या म्हातार्‍या माणसांना कोण घेऊन येणार? माझं वय काय आहे ठाऊक आहे का तुम्हाला? ९३ वर्षे ! पटत नाही ना. तुम्ही म्हणाल खोट बोलतोय, तरुण तर दिसतोस. पण माझ्या चिरतारुण्याचे रहस्य आहे, माझा मृत्यु! अवेळी झालेला. मृत्यु हे चिरतारुण्याचं वरदान आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही पटत! आपल्या जवळच्या एखाद्या मृत व्यक्तीची प्रतिमा आणा डोळ्यासमोर २० - २५ वर्षापुर्वी मृत झालेल्या एखाद्या व्यक्तीची प्रतिमा ! तिच्या चेहर्‍यावर सुरकुत्या दिसतायत तुम्हाला? दात अजुनही शाबुत असतील केस काळेभोर असतील, असो. तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे. वृद्धत्वाचा शाप जिवंत शरीराला असतो. मला चिरतारुण्याचा आशिर्वाद तात्याराव सावरकरांनी दिला आहे. तात्याराव सावरकर; सुर्याची उबदार प्रखरता, वार्‍याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृह्स्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्बता या सर्वांनी धारण केलेला मानवीय अवतार म्हणजे तात्याराव सावरकर. मला अजुनही आठवतो तो दिवस अटकेत होतो मी, माझी चौकशी चालु होती आणि बादरायण संबंध नसताना केवळ छळ करण्याच्या उद्देशाने त्या भिष्माचार्याला अटक करुन दिल्लीला आणलं. तात्यारावांना पाहताच क्षणी मी उठलो त्यांना नमस्कार केला. तात्याराव म्हणाले ' चिरंजीव हो'. मी म्हटलं तात्याराव माफ करा पण तुमच्या या आज्ञेच पालन माझ्याकडुन होईल अस मला नाही वाटत. तात्याराव म्हणाले वेडा आहेस नथुराम मी शतःयुषी हो असे नाही म्हटले, मी चिरंजीव हो असं म्हटलं आणि तु चिरंजीव झाला आहेस नथुराम ज्याक्षणी तु पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले त्याचक्षणी नथुराम गोडसे हे नाव चिरंजीव झालं आहे. गांधीवाद तु संपवलास की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा ठरेल पण तु गांधी संपवलेस आणि स्वतः उरलास. गांधींचे विरोधक सच्चे हिंदु राष्ट्र्वादी तर तुला आपल्या हृदयसिंहासनात अढळपद बहाल करतीलच पण गांधींचे समर्थक ही त्यांच्या चरित्रात तुला अमररुप देतील.गांधीच्या माता- पित्यांच्या उल्लेखाशिवाय शिवाय जसा त्याच्या कुठल्याच चरित्राचा प्रारंभ होऊ शकत नाही तसेच तुझ्या उल्लेखाशिवाय त्यांच कुठलच चरित्र पुर्ण होऊ शकत नाही. तात्यारावांचे शब्द ते शिलालेखच जणु, तात्यारावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद, मग तो खोटा कसा ठरणार? तर असा मी ९३ वर्षांचा बुड्ढाचारी ३९ व्या वर्षी सुळावर चढलेला, अवेळी मृत्यु. अवेळी होता पण आमंत्रित होता स्वीकृत होता , पण चिरतरुण! त्या अश्वथाम्यासारखा, त्या अश्वथाम्याच्या डोक्यावर खोल जखम झाली आहे म्हणुन तो तेल मागत फिरतो आहे. माझ्या हृदयात मस्तीक्षात खोल जखम झाली आहे किती वार झाले आहेत त्या जखमेवर देशाचे काष्ठानी केलेले तुकडे निर्वासितांमधील माता - भगिनींवर झालेले बलात्कार, पाकिस्तानला गांधींच्या बालहट्टापायी बहाल केलेले ५५ कोटी रुपयाचं अनुदान आणि अखंड हिंदुस्तानातुन अलग करुन पाकिस्तानला बहाल केलेली माझी सिंधु नदी. त्या अश्वथाम्याला अजुनही तेल हव आहे. पण मला मात्र स्पर्श हवा आहे तो त्या पवित्र पाण्याचा, त्या स्पर्शाची वाट माझ्या अस्थी पहात आहेत, गेली ६० वर्षे. माझ्या मृत्युपत्रात लिहुन ठेवले आहे माझ्या अस्थी पिढ्यान् पिढ्या हस्तांतरीत कराव्यात परंतु अखंड सिंधु अखंड हिंदुस्तानात येईपर्यंत त्या विसर्जित करु नयेत. माझं मृत्युपत्र वाचल्यानंतर तात्याराव म्हणाले, ' वाह नथुराम, आधुनिक भारतातील दधीची आहेस तु. तुझ्या या अस्थींनी शस्त्र होतील.' मी म्हटलं तात्याराव कशाला इतक्या मोठ्या माणसाची उपमा देता. भवानी तलवार लोखंडाची असली हे जरी सत्य असलं तरी लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार नाही होऊ शकत. पण निरुत्तर होतील तर ते तात्याराव कसले त्यांच्या समोर प्रश्न नव्हतेच त्यांच्या समोर फक्त उत्तर होती. तात्याराव म्हणाले, ' नथुराम महाराजांनी स्पर्श केला म्हणुन तलवारीची भवानी झाली तलवारीच्या पात्यापेक्षा मुठ जास्त महत्वाची, मुठी मागच्या पकडीमागे जिद्द असेल तरच तलवारीला धार येते. तु मागे अस्थी ठेवत नाही आहेस वृत्ती ठेवतो आहेस विचार ठेवतो आहेस त्यांची शस्त्र होतील.'
माझ्या आयुष्याचे जे सोनं झालं त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतकाच की मी लोखंडासारखा तात्याराजवळ गेलो आणि त्याच्या स्पर्शाने माझं सोनं झालं. माझ्या आयुष्यातल्या चुकांची दुर्गुणांची जबाबदारी माझी. जे हातुन चांगलं घडल त्याचं श्रेय मात्र तात्यारावांच. वाईटाचे उत्तरदाइत्व त्यांच्याकडे नाही. सुवर्णालंकार देवाच्या मुर्तीला आभुषित करण्याऐवजी तस्करांकडे गेले तर तो दोष परिसाचा नव्हे. नाही का?


तर असा मी ९३ वर्षांचा बुड्ढाचारी नथुराम विनायक गोडसे. गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी शेवटी माझा जन्म झाला. १९ मे १९ १०. वडिल विनायकराव पोस्टात नोकरी करायचे, आईचं नाव लक्ष्मी. विष्णुचे अनेक अवतार तुम्ही पाहीले असतील. पण लक्ष्मीचा फक्त कष्ट आणि वनवास भोगण्यासाठी घेतलेला अवतार गोडस्यांच्या घराव्यतिरिक्त कोणीही कुठेही पाहीलेला किंवा ऐकीवात नसेल. दशरथासारखा पुत्रवियोग सहन करीत तिने प्राण सोडले. वेदना तीच, तळमळ तीच, पुत्रप्रेमही तेच. फक्त राम वनवासाला निघाला नव्हता. त्याने परलोकाच्या प्रवासाची तयारी केली होती. लक्ष्मण कारागृहात कुजत सडत पडला होता. उर्मिला जवळ होती पण या लक्ष्मणाने श्रावणबाळाला कधीच मारलं नव्हतं.असो, विनायकरावांना मासिक वेतन रू १५/-, रू १०/- मध्ये चरितार्थ चालवायचा आणि रू ५/- वडिलांना पाठवायचे. विनायक आणि लक्ष्मीला तीन मुले झाली एकही जगलं नाही नवस आयास झाले. मुलगा जगावा म्हणुन, मग मुलगा झाला तो नथुराम. जगला ! , त्यांच्या नशीबी पुत्र वियोग होता म्हणुनऽऽऽऽ, गांधी हत्या व्हायची होती म्हणुन. त्यानंतरच आयुष्य सुरळीत गेलं. लहानपणी कधीच चोरी केली नाही त्यामुळे वडिलांची माफी मागण्याचा कधी प्रश्नच आला नाही. ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ कधीच घेतली नाही ब्रह्मचर्य पालन करतच होतो. निर्वासितांमध्ये खुप फिरलो त्यांना अन्नवस्त्रांचीही मदत केली परंतु ते अर्धनग्न अवस्थेत आहेत म्हणुन मी अर्धनग्न अवस्थेत कधीच राहीलो नाही, सुत कातलं नाही, संडास साफ केले नाहीत आणि फासाच्या दोरावर चढेपर्यंत मौन कधीच पाळले नाही. तस गांधींच्या आणि माझ्यात साम्य किंवा कॉमन पॉईन्ट एकच मी त्यांचा वध केला आणि त्यांच्या वधामुळे माझा अंत झाला. पण फरक मात्र मोठा, ते त्यांच्या तत्वांसाठी जगायला तयार होते आणि मी माझ्या तत्वांसाठी मरायलाही तयार झालो.


अर्थात माझ्या या आयुष्यात तुम्हाला स्वारस्य असण्याच काहीच कारण नाही , नाही का? गड चढुण जाण्यापुर्वी ती हिरकणी कोण होती? विलायती कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट कडुन अडवणारा बाबु गेनु जगला तो फक्त मृत्युचा क्षण. या अर्थाने नथुराम गोडसेच खरं चरित्र सुरु होतं ते ३० जानेवारी १९४८ पासुन गांधी वधानंतर खर तर नथुराम आयुष्य जगला ते फक्त ६५५ दिवस ३० जानेवारी १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ आणि या चरित्राचा श्रीगणेशा झाला तो मंत्रिमंडळाने पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांचा निर्णय घेतला त्या दिवशी. नाना आपटे तेव्हा मला विचारायला आले की आजचा अग्रलेख का बदलास? त्यावर मी म्हणालो आधी लिहीलेला अग्रलेख मला खोटा वाटायला लागला, नानाला तर विश्वासच बसला नाही की मी खोटा अग्रलेख का लिहीन ते? नानाला म्हणालो , ' नाना अग्रलेखाच नाव विचारलस नाही."क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे." मी लिहलं आहे की उद्याच्या संक्रांतीला आपण दसरा साजरा करुया. शमीच्या वृक्षावरुन शस्त्र काढुन सिमोल्लंघन करुया.' त्यावर आपल्याला अटक होऊ शकते अशी शंका नानाने उपस्थित केली. मी त्याला म्हणालो, 'आपलं अग्रणी हे हिंदु मुखपत्र आहे. अजुन सरकार हिंदुनाच टिचभर महत्व द्यायला तयार नाही तर त्यांच्या मुखपत्राला काय देणार? आपल्या संयमाचा चुकीचा अर्थ लावला जातो. हिंदुंची होणारी कत्तल दुर्लक्षिली जाते आहे कारण आपण गप्प बसणार सहन करणार हे गृहितच धरल जातं. शेकस्पियरचे एक वाक्य आहे ना - घावांना जर जिव्हा असत्या तर त्यांनी वेदना बोलुन दाखवल्या असत्या - पण आपल्या घावांना जिव्हा नाहीत तर फक्त अश्रु आहेत. आपल्या क्रोधाला फक्त अंगार नाही तर क्षमाशिलता आहे, इतरांनी अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे यात काही विशेषच मानल जात नाही, तो सृष्टी नियमच मानला जातो. सरकार माझ्या विधानांची गंभीर दखल घेईल पण ती गांधी हत्येच्या खटल्याच्या वेळीच. गांधींना थोपवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यांचा वध करणे. पण नानाला मात्र हे पाऊल आततायी आणि अविचारी वाटत होतं. वध करणे एवढ अनिवार्य आहे का? असा त्याचा सवाल होता. मी त्याला म्हणालो, ' घे बंदुक आणि घाल गोळी इतकी कुठलीही हत्या सोपी नसते, अकस्मात नसते. खुन असेल कदाचित पण वध नाही. आणि गांधीवध तर नाहीच नाही. वधाला जर अधिक विलंब हानिकारक होईल असही मला वाटतं.' इतिहासाच्या एका खंडाला आपण धक्का लावतो की काय असे वाटत असावे कदाचित नानाला. पण खंड वगैरे अशा मोठ्या शब्दांबद्दल माझं दुमत असल तरी इतिहासाच्या पानाला मी नक्कीच धक्का लावत नव्हतो. पण जर पान हे आज उलटलं नाही तर देशाच्या इतिहासाची बाकी पान कोरीच राहतील. काळाची पान उलटता येतात, फाडुन फेकता येत नाही. गांधींचे देशाच्या इतिहासातील पान कोणीही नाकारु शकत नाही आणि नथुरामसुद्धा ते करु इच्छित नाही त्यांच पान तसचं राहणार पुन्हा कधीतरी झंझावाती वादळ येईल, पानांची उलथापालथ होईल आणि ते पान पुन्हा समोर उघड होऊन पडेल. गांधींच अहिंसेच तत्व मी नाकारत नाही आहे. जगाला हिंसेपेक्षा अहिंसाच जास्त आवश्यक आहे. पण गांधींची अहिंसा स्वसंरक्षण स्वहित नाकारते. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे. स्वतःच्या अस्तित्व रक्षणासाठी धडपडणे याची व्याख्या हिंसा असे करणारी अहिंसा म्हणजे एक प्रकारे स्वःहिंसा नव्हे का? नानाला वाटत होतं की माझा हा निर्णय धाडसाच आहे. पण धाडस तर करावचं लागणार आणि कुणीतरी करायला हवं म्हणुन सगळेच वाढ बघत बसले तर हे कदापि होणार नाही. अर्थात निदर्शन करुनही बघितली पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. देशाच्या विभाजनाच्या वेळीही आम्ही निदर्शनच करत होतो. देशाच्या विभाजनाचा निर्णय हा अनावश्यक होता. अरे मुसलमानांची लोकसंख्या आणि टक्केवारी ती किती? त्यांचा संपुर्ण देशासाठी असलेला अठ्ठ्हास अनाठायी होता. तो तसा नसता तर मौलाना आझाद हिंदुस्तानमध्ये राहिले नसते. पण जीनांच्या वेड्या हट्टाला मान्यता देऊन केवळ कोणाचं मन मोडायच नाही, हिंसा नको म्हणुन गांधींनी विभाजनाला मान्यता दिली. व्यक्ति देशापेक्षा कधीच मोठी नसते आणि गांधी ही व्यक्ति स्वतःला देशापेक्षा मोठी समजु लागली तर मग देशसेवा , त्याग, या शब्दांना काय अर्थ राहतो. मुसलमान पंतप्रधान होण्यास तसा आमचा कधीच विरोध नव्हता पण लोकशाहीत तलवार उपसुन मागणी करायची नसते. जीनांनी तलवार उपसली आणि ती गांधींनी भारतमातेच्या छातीत खुपसुन लचका तोडला. अखंड सिंधु नदी हिंदुस्तानातुन निघुन गेली , देशाचा तुकडा पडला. त्याला जितके जीना जबाबदार तितके गांधींही जबाबदार, ते तर परकीय आणि हे स्वकीयच! नाही का? काय कमी निदर्शन केली होती का आम्ही? तेव्हाही बालभवनासमोर निदर्शनच करत होतो, शांततामय निदर्शनं. गांधी जीनांना जेव्हा भेटायला निघाले तेव्हा आम्ही त्याची गाडी अडवली त्यांना सांगितलं नका जीनांशी तडजोड करु, नका देशाचा तुकडा मोडु.पण आपला हा राष्ट्रपिता आपल्या छातीवर पाय ठेऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सुईणीसारखा त्यांच्या मदतीला धावला. मंत्रिंमंडळाच चुकलं एकच की ते गांधीजींच्या आमरण उपोषणाच्या धमकीपुढे नमले. गांधींनी स्वतःच्या देहाच्या अस्तित्वाला जेव्हा जेव्हा आव्हान उभ केलं तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ झुकलं. देशाच्या अहिताचेच निर्णय घेतले गेले. हा देहच यापुढे देशाच्या विनाशाचे कारण ठरणार होता. आज मुसलमान एक तुकडा मागुन घेऊन गेले उद्या शिख मागतील आणि परवा हिंदु मागतील पण हिंदुंच्या तुकड्याचे चा्र्तुवर्णीय चार तुकडे करतील, पुन्हा त्या वर्णांमध्ये उपजाती आहेतच, मग अखंड भारतवर्ष या संज्ञेला काय अर्थ राहतो. ब्रिटीशांची आपण एकत्र का लढलो? भगतसिंगाने फक्त पंजाबच का नाही मागितला? सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज घेऊन फक्त बंगालसाठीच का नाही आले? सुदावरदीने हिंदुची कत्तल केली तेव्हाही आम्ही निदर्शनच करत होतो. सुदावरदी राजदबावाला शरण आला परंतु त्याचे अनुयायी कत्तल करतच होते. आमची निदर्शन सुरु होती आणि गांधींचे आमरण उपोषण सुरु होते. शेवटी हिंदुंनी शस्त्र खाली ठेवली. मला अजुनही आठवतं आहे, एक गरीब हिंदु पुढे आला आणि बापुंना म्हणाला - बापु तुमच्या हत्येच पातक माझ्या कपाळी नको आहे म्हणुन मी शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतोय. पण मुसलमान मोहल्यात माझं एकच हिंदुच घर आहे - त्या रात्री हैद्राबाद सोडण्यापुर्वी मी त्या हिंदुकडे गेलो. त्याच्या घरी एकच हलकल्लोळ माजला होता. त्याच्या ८ वर्षाच्या मुलाची कत्तल केली होती मुसलमानांनी पण त्याच्याकडे फक्त आक्रोश होता आपल्या मुलाचं कत्तल केलेलं कलेवर माझ्या समोर फेकुन तो मला म्हणाला - जा हे तुमच्या गांधींकडे घेऊन जा, याचं रक्त घेऊन जा आणि त्यांना सांगा पुन्हा उपोषणाला बसलात तर मोसंबीचा रस पिऊ नका याच रक्त प्या.- काहीच बोलु शकलो नाही मी कारण गांधी माझेही राष्ट्रपिता होते. त्यांचा राष्ट्रपिता म्हणुन मीही स्विकार केला होता. क्षणभर अस वाटलं की घुसाव त्या मोहल्यात आणि एकेका मुसलमानाला बाहेर काढुन कापावं.पण मग विचार केला संहारच करायचा तर संरक्षण का? आता जर मी संहार केला तर मीही त्यांच्या इतकाच असंस्कृत ठरेन. नानाने मला तात्यारावांचा सल्ला घेण्यास सांगितले पण मला ते नको होते सतीच वाण घेतलेल्यांना अग्निच भय नसतं पण तात्यारावांच्या कष्टायत्नात माझ्या हातुन चुकुनही एकही संविधा पडायला नको. तात्याराव एकदा म्हणाले होते जर गांधी राजकीय संत असतील तर त्यांनी रामदास स्वामींचा आदर्श ठेवावा गरज पडली तर रामदास स्वामी सदैव शिवबाच्या पाठी उभे होते पण त्यांनी मात्र स्वराज्य उभारणीत कधीही लुडबुड केली नाही. वध करण्याच्या आधी मी नाना आपटे कडुन दोन वचने घेतली, मला आता एकटाच प्रवास करायचा होता कारण मी वध उघडपणे करणार होतो आणि स्वतःला स्वाधीन करणार होतो त्यामुळे नाना माझ्या सोबत असणे त्याच्यासाठी धोक्याचे झाले असते म्हणुन मी नानाला माझी साथ सोडायला सांगितली हे पहिलं वचन. वधानंतर मी लिहिलेला लेख अग्रणीत छापायचा हे नानाकडुन घेतलेलं दुसर वचन. एवढ्या वर्षांची साथ सोडायला सांगताना माझ्या जिवाला जड जात होतं. पण एक वध एक फाशी याच तत्वावर मला पुढची पावलं टाकायची होती. एका वधासाठी मला दोघांना फाशी मला मान्य नव्हती. खटल्यामध्ये मी गांधी हत्या का समर्थनीय आहे? याची माझी बाजु तर मांडणारच होतो. आणि त्यामुळे गांधी हे हिंदुस्तानचे नसुन पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांचा वध हे अपरिहार्य कर्तव्य आहे याची मला खात्री पटली.

३० जानेवारी १९४८ संध्याकाळी ५ च्या पुर्वी १० एक मिनीटे असताना मी बिर्ला भवनाच्या दाराशी गेलो. दारावरील पहारेकरी प्रार्थनेला जाणार्‍यांचे निरीक्षण करत होते. त्यांचं मला सर्वात अधिक भय होतं, म्हणुन चार पाच लोक जात होते, त्यांच्यातलाच मी एक आहे असं समजलं जावं ही दक्षता घेऊन आत गेलो. ५ वाजल्यावर १० एक मिनीटे होऊन गेली होती. गांधी आणि त्यांच्या जवळचे लोक खोलीच्या आतल्या परिसरातुन प्रार्थना स्थळाकडे निघु लागल्याच मला दिसलं. ते जिथुन अंगणाच्या पायर्‍या चढतील त्या ठिकाणच्या आसपास लोकांच्या आवरणात मी उभा राहीलो. गांधी पायर्‍या चढुन ५-६ पावलं पुढे आले, गांधींच्या भोवताली लोक असले तरी मला हवी असलेली मोकळीक मला मिळतेय एवढं मी बघितलं होतं. मला आणखी ३ सेकंदाचा वेळ हवा होता. दोन पावलं पुढे सरकुन गांधींच्या पुढ्यात जाणं, शस्त्र बाहेर काढणं आणि गांधींनी आपल्या जीवनात जी म्हणुन उपयुक्त देशसेवा केली, त्याग केला त्यासाठी त्यांना वंदन करणं. त्या दोन मुलीतली एक गांधींच्या जवळ होती. तिला दुखापत होईल अशी मला भीती होती. त्यावरील उपाय मनात योजुन मी पुढे सरलो. गांधींना नमस्ते या शब्दात वंदन केलं, एक पाऊल पुढे सरलो आणि............. आधीच क्लेश असलेले गांधी "अह्" असा अस्पष्ट आवाज करतं अचेतन होऊन खाली पडले.


वध झाला आणि मला अटकही करण्यात आली. पोलीस अधिकार्‍यांनी मला रात्रभर जागवल नाही पण ते कदाचित रात्रभर जागले असतील. खरं तर मला त्यांना एकट जागतं ठेवणं तस जीवावर आलं होतं पण मग मी विचार केला, मी दुपारी जागा होतो, पिस्तुल स्वच्छ करत होतो, त्यात गोळ्या भरत होतो. त्यावेळी त्यांनी वामपुक्षी घेतली असेल कदाचित, मग आता ते थोडे जागले तर काय बिघडलं. शांत झोप लागली मला त्या रात्री, अखंड हिंदुस्तानात आम्ही दोघच त्या रात्री शांतपणे झोपलो असु. कोठडीत झोपलेला मी आणि शितगृहात चिरनिद्रा घेणारे गांधी. बाकी सर्व देश धगधगत होता. काहींची कत्तल होत होती तर काही कत्तल करत होते. मातेच्या उदरातील गर्भही त्यारात्री शांतपणे पोहुरले नसतील. माझ्या आई - वडिलांना स.बु. बर्वेंनी आदल्यारात्रीच फरासखान्यावर नेवुन ठेवले, त्यामुळे ते वाचले. पण माझ्या भावाला दत्तात्रयला मात्र मारहाण झाली दुसर्‍या दिवशी तर सकाळ पासुन तर अटकसत्राला सुरुवातच झाली. विष्णु करकरे, डॉ. परचुरे, शंकर किस्तय्या, मदनलाल, नाना आपटे आणि तात्याराव सावरकर, एकेक करत सगळे मंडळी जमा होऊ लागले. तात्यारावांना तर याखटल्यात उगाचच गोवण्यात आल होतं. पण खरं सांगु का? तात्यारावांना अटक झाली याचा मला एक वेगळाच फायदा मिळाला. तो म्हणजे त्यांचा मिळालेला उदंड सहवास, तात्याराव निर्दोष होते त्यामुळे ते निर्दोष मुक्त
होणार ही सर्वांनाच खात्री होती. पण बाहेर असे तात्याराव एकटे कधीच भेटत नसतं. त्यांच्याबरोबर असणारी लोकांची वर्दळ त्यांच लिखाण, सभा. पण इथे तात्याराव फक्त आमचेच होते. खुप शिकायला मिळालं त्यांच्या सहवासात, आयुष्याचे शेवटचे दिवस अगदी चांगले गेले, सत्कारणी लागले. मृत्युंजयच तो मृत्युची सावली सुद्धा त्यांच्यापासुन अंग चोरुन उभी होती. एकदा आम्ही असेच सर्वे गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात एक सिनीयर जेलर राऊंडसाठी आला, आम्हा सगळ्यांकडे एक एक पुठ्याच कार्ड दिलेलं असायचं त्याच्यावर कैद्याच नाव आणि त्याच्यावर लागलेली कलम असायची त्या जेलरला पाहताक्षणी तात्याराव उठले त्यांनी आपल्या पुठ्याच कार्ड छातीशी धरलं जेलर ओशाळला म्हणाला, ' सावरकरजी ये क्या कर रहे है ' तात्याराव म्हणाले, ' क्या कर रहां हुं? यही तो जेल का कानुन है वही तो मै कर रहां हुं.' जेलर म्हणाला, 'मगर बाकी लोक भी तो है, वे तो खडे नही रहें.' तात्याराव म्हणाले, ' वह तो बच्चे है. मै दुबारा हुं.' तुरुंगात दुसर्‍यांदा येणार्‍या कैद्याला दुबारा म्हणतात. तात्याराव खरचं दुबारा होते, स्वातंत्र्यापुर्वीही त्यांनी कारावास भोगला परकीय सरकारशी लढले म्हणुन आणि स्वातंत्र्यानंतर स्वकीय सरकारने त्यांना कारावासच भोगायला लावला. आम्हाला लाल किल्यात ठेवलं होतं. विषेश न्यायालय तिथेच भरायचं न्यायालय नसेल त्यादिवशी मोकळा दिवस असायचा. गप्पा तर अशा रंगायच्या की कोणाला वाटेल सहलीसाठी मित्रमंडळी जमली आहेत की काय. शिक्षेच सावट आम्ही सर्वांनीच मान्य केललं असल्यामुळे ते कोणालाच जाणवलं नाही, ती आम्हाला सावलीच वाटायची आणि मृत्युदंड हा तर मुक्ततेचा मार्गच. फासाचा दोर मला जाणवत होता तो पोलीस अधिकारी, जेल कर्मचारी आणि न्यायमुर्तींच्या चेहर्‍यावर. त्यांच्या चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या सुंभाने विणल्या आहेत की काय असे वाटतं होतं. पोलीस सुप्रिटंडट शेख चिडचीडल्यासारखे वागत होते. अर्थात ही चीडचीड माझ्यावर नव्हती, स्वतःवरच होती. तिरडी बांधणार्‍यामाणसाची तत्परता त्यांच्या हालचालीमध्ये मला जाणवत होती. तिरडी बांधायला तर हवी पण आपल्या माणसाला आपण आपल्या हाताने शेवटच्या प्रवासाला घेऊन जायचे त्याला अग्नी द्यायचा, या कल्पनेने डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाही. अजुनपर्यंत मजबुतपणे तिरडी वाहुन नेणारे खांदे मी तरी पाहीले नाहीत. मृत्यु माणसानाच नाही तर पशुंनाही जाणवायला लागला होता. आम्ही एक मांजराच पिल्लु पाळलं होतं लाल किल्यावर, मोठ मजेत होतं. दिवसभर खेळायचं उन्हात आणि सगळ्यांकडुन दुध वसुल करायचं. कधी माझ्या पांघरुणात येऊन शिरायचं तर कधी नानाच्या कधी तात्यारावांच्या डोक्यावर जाऊन बसायचं. तात्याराव एकदा गमतीने म्हणाले सुद्धा गेल्याजन्मी गोरा साहेब असला पाहीजे. गेल्या जन्मीची हौस या जन्मी भागवुन घेतो. न्यायमुर्ती निकालपत्र वाचणार होते त्याच्या आधीची रात्र, ते पिलू माझ्या अंथरुणाजवळ झोपलं होतं मध्यरात्री अचानक ते ताडकन् उठुन जाग झालं आणि कोठडीतुन पसार झालं. माझ्याबरोबर सावली सारखा चालणारा मृत्यु त्याला जाणवला असेल कदाचित. मला मात्र मृत्यु कधीच टोचला नाही बोचला नाही. जाणीवेच्या गाभार्‍यात कधीच तो सलला नाही. मी कस्तुरी सारखा पचवला असेल बहुदा. त्याचा सुगंध मला कधी जाणवलाच नाही. पण आमच्यात एकटा पडला तो दिगंबर बडगे. तो माफीचा साक्षीदार होता. बडगेचा मला कधीच राग आला नाही. त्याचा विचार मनात आला की फक्त कीव यायची. एखादी गोष्ट सत्सद विवेकबुद्धीने मनात स्मरुन केली तर मग परिणामांना कसं सामोर जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. परिणामांचा विचार केला नाही तर कातडी गमावते पण आतला माणुस एकसंध राहतो तो दुभंगत नाही यालाच सदेह वैकुंठाला जाणे असे म्हणतात. बडगेने पहिला मार्ग स्वीकारला त्यामुळे तो एकाकी पडला. माझी आणि बडगेची फक्त एकदा आणि एकदाच भेट झाली. वरवर ती भेट अपघाती वाटत असली तरी नीट विचार केला तर वाटतं की घटीत होती. इंस्पेक्टर सावंतांनीच ती घडवुन आणली होती. इंस्पेक्टर सावंत हा एक वेगळाच माणुस होता तो जर न्यायासनावर बसला असता तर त्याने आम्हा सगळ्यांनाच मुक्त केलं असतं. बडगेला त्यादिवशी कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणुन हजर करणार होते, तेव्हा इंस्पेक्टर सावंतांनी बडगेची आणि माझी भेट घडवुन आणली. सांवंतही तिथेच होते कारण सत्याला साक्षीदाराची अडचण येत नसते. बडगेला पश्चाताप झाला होता मी म्हणालो त्याला की पश्चातापाला काही अर्थ नसतो कारण क्रिया आधीच घडुन गेलेली असते. तु चुकला असशील असे तुला वाटत असेल तर तो समज मनातुन काढुन टाक. जगण्यासाठी प्रयत्न करणं जीव वाचवण्यासाठी धडपडण हा गुन्हा नाही. तो धर्म आहे, नव्हे ते प्रथम कर्तव्यच आहे. पण आपला जीव वाचवत असताना आपण इतर कुणाचा जीव अनाठायी घेत नाही ना, याची जाण ठेवावी. तु हिंदु आहेस हे जर तु नाकारलं असतं तर मला तुझी शरम वाटली असती. पण तुझ्या निवेदनाने माझ्या फासाचा दोर भक्कम झाला तरी मला तुझा राग येणार नाही. कारण मी मरणाला सिद्ध आहे. एकास एक हा सृष्टी नियमच आहे गांधी मेले नथुराम मेलाच पाहीजे. फक्त आपले निवेदन सत्य असेल याची काळजी घ्या. आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा खोटं निवेदन देऊ नकोस. तात्याराव निर्दोष आहेत. त्यांना अडकवण्याचा खोटा प्रयत्न जर तुझ्या मुखातुन होत असेल तर तुला वरच्या दरबारातही क्षमा नाही. अरे तात्याराव हीरा आहे. आपण फक्त कोंदण, कोंदणाने हीर्‍याचा आकार घ्यायचा असतो हीरा झाकवायचा वेडा प्रयत्नदेखील करायचा नसतो. एवढे सांगुन त्याला तेथुन जाण्यास सांगितले. बडगे आणि माझ्यामध्ये भेट घडवुन दिल्यामुळे इंस्पेक्टर सावंतांचे आभारच ते. सुर्याची काळजी करणारे आपण कोण? सुर्याला ग्रहण लागत अस आपल्याला वाटत, तोही आपल्याचा दृष्टीचा दोष असतो, बघण्याची आपली जागा चुकलेली असते. उद्या माणुस चंद्रावर उतरला तर त्याला
जाणवेल, सुर्याला कधीच ग्रहण लागत नाही.

खटला संपला! मला आणि नानाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हा खटला मी स्वतःच चालवला असल्याने वधामागची भुमिका स्पष्ट करु शकलो. आम्हा दोघांना लाल किल्याहुन आता अंबाला येथे नेणार होते कारण फाशीची सोय तिथेच होती. माझी इच्छा होती की येरवड्याला न्यायची, आई - वडिलांचं शेवटच दर्शन घेता आलं असतं. तसा अर्ज करण्याची सुचनाही मला सावंतांनी केली होती. पण आता कुठलीही इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार मला कसा असणार, मला आठवत होत की जेव्हा मला लाल किल्ल्यात आणल गेल तेव्हा सही करुन माझा चार्ज बॉडी रिसीट म्हणुन घेतला होता . नथुराम गोडसेचा शासकीय कागदपत्रात एकदा बॉडी म्हणुन उल्लेख झाला तेव्हा पासुन माझ्यातला मी उरलोच कुठे होतो. उद्या अंबाल्याच्या पोलीस पार्टीला नथुरामचा चार्ज नव्हे तर बॉडीचा चार्ज देणार आणि तेही बॉडीचाच चार्ज घेणार, आता या बॉडीची डेडबॉडी होणं ही फक्त एक औपचारिकता. आई - वडिलांची भेट व्हावी कारन त्यांना मला शेवटच भेटता याव म्हणुन, दिल्लीला येतानाच त्यांच शेवटच दर्शन झालं, असो. अंबाल्याला जायचं होत म्हणजे पानीपत मधुन चला त्या निमित्ताने त्या पवित्र भुमीच दर्शन तरी झालं. नाहीतर एरवी कशाला जाण झाल असतं. माझा अलिप्तपणा पाहुन सुप्रिटंडट शेखना माझा रागही येत असे. पण खटला चालु असताना त्यांच्या बसण्याच्या जागेवर गुलाबाची फुलं कोण आणुन ठेवतो हा प्रश्न मला नेहमीच पडत असे मी शेखना नेहमीच विचारायचो आणि ते नेहमीच उत्तर द्यायला टाळाटाल करायचे. पण अंबाल्याला जाण्याच्या आधी शेखानी मला माझ्या प्रश्नाच उत्तर दिलं. ती गुलाबाची फुलं त्यांची मुलगी जास्मीन आणुन द्यायची. ती गर्भवती असुनही, माझ्यासाठी ती दररोज दर्ग्यात जाऊन मन्नत मागायची. तिला प्रत्यक्ष जाऊन धन्यवाद देणे तर शक्य नव्हते पण सुप्रिटंडट शेख याच्या मार्फत तिला मी निरोप पाठविला की जर तुला तुझ्या या भावावर इतक प्रेम असेल तर तुला होणार्‍या बाळाची काळजी घे तुला मुलगाच होईल त्याच्यावर माझे संस्कार कर. उद्या जेव्हा या देशाला नथुरामची गरज पडेल तेव्हा हवा असलेला नथुराम तु जन्माला घाल. सुप्रिटंडट शेखांचे डोळे पाणावले. मला म्हणाले, ' पिस्तुलाच्या गोळीचा चाप ओढण्यासाठी मला या वर्दीच चिलखत घालाव लागत पण तु कुठलच चिलखत नसताना चाप ओढलास.' मी त्यांना म्हणालो की मला इतका मोठा करु नका शेख साहेब मी इतका मोठा नाही आहे. माझ्यात मोठेपणा असलाच तर तो इतकाच की ज्या वेळी जे करण गरजेच होत ते मी केलं. परिणामांची कल्पना असताना, पण माझ्याही अंगावर चिलखत होतच. काश्मिरला माझ्या देशातील सैनिकांनी सांडलेल्या रक्ताच चिलखत, फाळणीच्या वेळी माझ्या हिंदु बांधवांच्या रक्ताच चिलखत, माता भगिनींच्या भ्रष्ट झालेल्या शीलाच चिलखत, सावरकरांच्या विचारांच संस्कारांच चिलखत. मी काहीच केलं नाही मी तर फक्त ऋण फेडलं. पण हा नथुराम मातृभुमीकरीता फक्त एकच जीव ओवाळु शकतो याची खंत आहे.' खोट नाही सांगत पण मृत्युची मलाही खंत वाटली, मी मृत्यंजय नाही आहे. फासाच्या दोरावर लटकण्यापुर्वी जेव्हा माझ्या चेहर्‍यावर काळा बुरखा चढवला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रु आले या मातृभुमीच दर्शन परत घेता येणार नव्हते, या मातीचा सुगंध, सिंधु नदीचा स्पर्श मला कधीही घेता येणार नाही. या सगळ्यांच दुःख मलाही जाणवलं.

अंबाल्याला नाना आपटे आणि मी पोहचलो. माझी कोठडी फाशीखान्याच्या समोरच होती. फाशी होण्याआधी त्याची रंगीततालीम चालु होती. तुम्हाला वाटेल की अरे फाशीची सुद्धा रंगीततालीम चालते? हो चालते. माझ्या वजनाची बाहुली घेऊन त्याची रेग्युलर हेंगिंग प्रमाणे तालीम होत होती. पण बाहुली बनवताना काहीतरी घोळ झाला होता सगळे घामाघुम झाले होते बिचारे, हेंगिंग स्टाफचे लोक म्हणत की, काय म्हणे मानेला ' प्रॉपर चर्क ' भेटत नाही. मी त्यांना म्हणायचो बाहुलीच्या बदली मला उभे करा, हो पण ते त्यांच्या नियमात बसत नव्हते, असो. फासावर जाण्यापुर्वी हातात काही पकडता येईल का? असा प्रश्न इंस्पेक्टर सावंतांना केलाहोता पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती. तसं आमच्याकडे अखंड हिंदुस्तानाचे मानचित्र, भगवा ध्वज आणि भगवतगीता एवढेच सामान होते. ते अखेरच्या श्वासापर्यंत आमच्या जवळ असावे अशी आमची इच्छा होती. येथील जेलरांनी आम्हा दोघांना फासावर जाताना त्या वस्तु बाळगण्याची परवानगी दिली.

फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला ८ दिवस शिल्लक असताना गांधींचे सुपुत्र देवीदास गांधी मला भेटायला आले. तशी आधी आमची भेट झाली होती एका पत्रकार परिषदेत, ते हिंदुस्तान टाईम्सचे पत्रकार म्हणुन आले होते आणि मी अग्रणीचा संपादक म्हणुन. गांधी वधाच्या दिवशी मला अटक केली तेव्हाही ते मला भेटायला आले होते आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला झालेल्या वैयक्तिक नुकसानाबद्दल मी त्यांचे सांत्वनही केले. या वधामागील भुमिका काय होती? हे मी तुम्हाला सांगीन असा शब्दही त्यांना दिला होता. तसं खाजगीत भेटणं नियमानुसार शक्य नव्हतं पण जेलर साहेबांनीच तशी सोय केली होती. मी देवदासना म्हणालो, आज कस काय येणं केलत दोन वर्षांनंतर वेळ मिळाला. थोडसं संकुचित मनाने ते मला म्हणाले काही कागदपत्रावर सही हवी आहे तुमची. ती कागदपत्र म्हणजे वकालतनामा त्यांना माझी केस स्वीकारायची होती. देवीदास यांच्या म्हणण्यानुसार मी कोर्टात केस लढवताना काही मुद्दे वगळले होते. त्यांना माझ्या फाशीला आव्हान द्यायचे होते पण मी त्यांना म्हणालो मी वध केला आहे त्यामुळे मला जगण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला माझे वकीलपत्र नाही देऊ इच्छित. त्याच कारण त्यांनी माझ्याकडे विचारल मी त्यांना म्हणालो, तुम्ही वकालतनामा पुढे केलात तेव्हाच मी समजलो पण तुम्ही दुखावु नये म्हणुन उत्तर द्यायचे टाळत होतो. गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणुन त्यांच्या मारेकर्‍यालाही देहदंड देऊ नये हाच युक्तिवाद आहे तुमचा पण तो कायद्यात बसत नाही वकिलाने कायदा समजवुन मगच वकालतनाम्यावर सही मागायची असते कायद्याच्या कक्षेत भावना व्यक्तिगत हेवेदावे नाहीत. केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठीच ते माझ्याकडे आले होते. पुढे मी त्यांना म्हणालो तुम्हाला वकिलपत्रच जर स्वीकारायच होत तर तुम्ही तात्याराव सावरकरांच का नाही स्वीकारलं? नाना आपटेंच का नाही स्वीकारलं? या निरपराध माणसांच्या बचावाला तुम्ही का नाही उभे राहीलात? तुम्ही बचावाला उभे राहताय तर नथुराम गोडसेच्या का तर एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा हे आपल्या पित्याच तत्वज्ञान सिद्ध करण्याचा क्षीण प्रयत्न म्हणुन. हे ऐकुन देवीदासना कदाचित वाईटही वाटल असेल. एक व्यक्ति या कक्षेपलिकडे एक विचार म्हणुन गांधींचा विचार मी करु शकत होतो तसे देवीदास करु शकत नव्हते. तुम्ही काय विचार केलात? असा सवाल देवीदासजींनी मला विचारला. पण हा प्रश्न विचारायला त्यांनी दोन वर्षे विलंब लावला. तशी मागे मी त्यांना ग्वाही दिली होती. या वधामागचा उद्देश वैयक्तिक कधीच नव्हता उद्देश फक्त राजकीय आणि राजकीयच होता. पण त्यांना मात्र हे पटत नव्हतं आणि कुठेतरी हे पटवुन घेण्याचा प्रामाणीक प्रयत्न ते करत होते त्यासाठीच ते माझ्याकडे आले होते हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यांनी प्रयत्न केला तो त्यादिवशीच कारण ८ दिवसानंतर नथुरामच्या बचावाचे सारे मार्ग बंद झाले ते शल्य त्यांना आयुष्यभर सलत राहणार होते. आज वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. त्यांना मी बसायला सांगितले. आणि म्हणालो की देवीदासजी मी माझ मृत्युपत्र लिहलं आहे त्यात माझी पहिली अंतिम इच्छा काय लिहीली आहे सांगु? सिंधु नदी अखंड हिंदुस्तानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित केल्या जाऊ नयेत, मगच त्या सिंधु नदीत विसर्जित कराव्यात. पिढ्यान पिढ्या हस्तांतरीत केल्या तरी चालतील पण त्या जतन कराव्यात. देवीदासजी आपल्या हिंदु धर्मात अस्थी दहाव्या दिवशी विसर्जित करतात तो पर्यंत त्या घराबाहेर बांधुन ठेवतात. अस्थींच विसर्जन होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ति मिळत नाही असा समज आहे. पण मी जाणुन बुजुन माझा आत्मा बंधनात ठेवणार आहे, त्याला मुक्त होऊ देणार नाही. कारण गांधी जसे तुमचे पिता आहेत तसे ते माझेही राष्ट्रपिता आहेत म्हणुन. गांधींनी शेवटची इच्छा प्रदर्शीत केली होती की त्यांची रक्षा सर्व नद्यांमध्ये विसर्जित केली जावी पण पाकिस्तानने त्यांची रक्षा सिंधु नदीत विसर्जित करायची परवानगी नाकरली जणु काही ते पाक पाणी त्यांच्या रक्षाच्या स्पर्शाने अमंगल होणार होते, तेव्हा मी एक खास पत्र पाठवुन भारत सरकारला विनंती केली होती गांधींच्या रक्षेचा काही अंश तरी जतन करा कारण या देशाचे शुर जवान केव्हा तरी सिंधु नदी हिंदुस्तानात खेचुन आणतीलच तेव्हा ती रक्षा सिंधु नदीत विसर्जित करा आणि हे कधीतरी होईलच कारण हा देशच भगिरथांचा आहे गंगा खेचुन आणणार्‍यांचा आहे. पण माझी विनंती मानली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडु नये म्हणुन दहाव्या दिवशी मी माझा आत्माही मुक्त होऊ देणार नाही. मरणांत आणि वैराणी असे सगळेच म्हणतात पण आयुष्यभर जी मुल्य पुजली त्यांना मृत्युनंतरही वंदन करणारा नथुराम एकच असतो. देवीदासजी तुमच्या पित्याशी माझं वैयक्तिक वैर काहीच नव्हतं पण त्याच भौतिक अस्तित्व संपवण्यात माझ्या देशाच भलं होतं. मी विद्वान नसेन देवीदासजी पण विद्वान माणसांच्या सहवासात मी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत अगदी श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो. माझही स्वतःच एक स्थान होतं मान मरातम होता. गांधींचा वध करण्यापुर्वी त्यानंतर मी या सगळ्या गोष्टींना मुकणार आहे याची मला जाणीव होती पण मी मृत्यु स्विकारला भेकडासारखा पळुन नाही गेलो मला माझी भुमिका मांडायची होती. कारण माझ्याकडे माझी अशी भुमिका होती, विचार होता. गांधी हे महान होतेच जे सत्य आहे ते मी स्विकारण्याची आणि नाकारण्याची काहीही गरज नाही. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेशाविरुद्ध त्यांनी जो निर्भिड लढा दिला तो स्तुत्यच आहे. भारतात परत आल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन खरा भारत बघण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो आदरणीयच होता. दांडी यात्रा, चलेजाव चळवळ, मीठाचा सत्याग्रह या सर्वांमुळे मी स्वतः त्यांचा भक्त होतो गांधींना अटक झाली तेव्हा "साबरमतीनो संत जेल मा छे" या घोषणा माझ्याही ओठांवर होत्या. पण फाळणी अनावश्यक होती, तो गांधींचा निर्णय चुकीचा होता. त्यानंतर निर्वासितांची झालेली कत्तल, काश्मिरला लढणार्‍या आपल्या देशाच्या सैनिकांविरुद्ध पाकिस्तानला मदत म्हणुन दिलेले ५५ कोटी रुपयांच अनुदान हे सगळ अक्षम्य होतं. गांधीनी कधी हिंदु मुस्लिम असा पक्षपात नाही केला पण पाकिस्तानने केला आणि गांधींचा सर्वात मोठा पराभव हाच आहे. गांधींच्या रक्षा सिंधु नदीत विसर्जित करायला त्यांनी नाकारल्या, गांधी गेले तेव्हा पाकिस्तान आकाशवाणीने बातमी दिली की हिंदुंचा एक पुढारी गेला आम्ही गांधींना हेच सांगत होतो गांधी तुम्ही आमचे आहात पण ते म्हणत होते नाही मी तुमचा नाही मी त्यांचा आहे. गांधींचा आणि गांधीवादाचा विरोधक जितका मी नाही तितके त्यांचे शिष्य आहेत.मी गोळी झाडली गांधी कोसळले पडता पडता त्यांच्या तोंडातुन "अह्" असा अस्पष्ट आवाज आला. पण सगळीकडे अफवांच मोहोळ उठलं की गांधी हे राम म्हणाले. माझा जबाब नोंदवताना कोर्टात जबानी घेताना माझ्या मुखातुन हे असत्य वदवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जात होता पण मी बदललो नाही. गांधी हे राम म्हणालेच नाही तर मी असत्य का बोलु? पण जर त्यांच्या शिष्योतमांनी जर का हा डंका असाच पेटत ठेवला आणि इतिहासात त्याची नोंद झाली तर गांधींचा आणि गांधीवादाचा सर्वात मोठा पराभव ठरेल. देवीदास म्हणाले हे कसं काय होऊ शकतो? मी म्हणालो ज्या माणसाने आयुष्यात कधीही राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यांच्यात कधी भेद केला नाही समजला नाही तो माणुस मरताना फक्त रामाचच नाव घेईल राम आणि रहीम दोघांचही घेईल ना आणि कुणा एकाचच जर घ्यायच असेल तर रहीमच घेईल कारण राम त्यांच्या हृदयात होता आणि रहीम मुखात.


१५ नोव्हेंबर १९४९ सकाळी आठ वाजता नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांना फाशी देण्यात आली हातात अखंड भारताचे मानचित्र भगवा ध्वज आणि भगवदगीता दोघांनीही घेतली होती. फासाचा दोरं गळ्यात अडकवल्यावर दोघांनीही अखंड भारत अमर रहे आणि वंदे मातरम् असा घोष केला. त्यानंतर पायाखालील ळीचा दांडा ओढण्यात आला.

धन्यवाद...